माननीय पालक मंत्री पुणे जिल्हा / महापौर, मनपा पुणे
विषय - कालवा फुटी मुळे बाधित नागरिकांना देण्याची नुकसान भरपाई जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावी.
महोदय / महोदया,
काल पुण्यात झालेल्या कालवा फुटी दुर्घटनेला संपूर्णपणे जलसंपदा विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. कालवा समितीची बैठक झाली नसताना, शेतकऱ्यांची कोणतीही मागणीपत्र गोळा न करता, कालव्यामधून १२०० / १३०० क्युसेक ने पाणी शेतीसाठी सोडल्यानेच त्या प्रेशर ने कालवा फुटला. पुण्यातील कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून फक्त ३०० क्युसेक पाणी सोडणे आवश्यक आहे आणि तेव्हडेच पाणी सोडले असते तर कालवा फुटलाच नसता. आणि अगदी दुर्घटना झालीच असती तरीही एव्हडी नुकसानी झालीच नसती.
जलसंपदा विभागाच्या आग्रहावरून पुणेकरांच्या करांचे १०० कोटी रुपये खर्च करून मुंढवा येथे पुण्याचे सांडपाणी शुद्ध करून पुढे शेतीसाठी पुनर्वापरा साठी बेबी कॅनाल मध्ये सोडण्याची योजना २ वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली.त्यातून रोज ५५० MLD पाणी (वर्षाला ६. ५० TMC) पाणी या प्रकल्पातून शेतीसाठी सोडता येऊ शकते. मात्र जल संपदा विभागाने २ वर्षात मिळून फक्त ६. ५० TMC पाणी या प्रकल्पातून शेतीसाठी उचलले आहे. व त्यामुळे ६. ५० TMC धरण्याचे पिण्याचे पाणी अकारण शेतीसाठी वापरले गेले. यंदा पाऊस थांबल्यानंतरही १ सप्टेंबर पासून जेंव्हा मुठा कालव्यातून १२०० क्युसेक ने धरणातून शेतीसाठी पाणी सोडले जात होते त्याच काळात २० सप्टेंबर पर्यंत मुंढवा प्रकल्पातून जलसंपदा विभागाने शेतीसाठी पाणी घेतले नाही.
या सर्व गोष्टीतून तात्पर्य एकच निघते कि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बेपर्वाई व हम करे सो कायदा या वृत्तीमुळे कालवा फुटून शेकडो लोकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्वांना महाराष्ट्र शासन / मनपा आता नुकसान भरपाई देईल. आमची मागणी आहे कि सदरहू नुकसान भरपाई जनतेच्या करांच्या पैश्यातून न देता कालवा फुटीस जबाबदार जलसंपदा अधिकाऱ्यांकडून वसूल करावी.
विवेक वेलणकर विश्वास सहस्रबुद्धे पुणे / २८-०९-१८
सजग नागरिक मंच सजग नागरिक मंच
No comments:
Post a Comment