राज्यात पाण्याचे भीषण संकट
पावसाळी हंगाम हा येत्या १५ ऑक्टोबर रोजी संपणार असताना, राज्यात पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्वाधिक भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, त्याखालोखाल नागपूर, अमरावती आणि नाशिकमध्ये पाणी संकट उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने पाण्यावरून आगामी काळात शहर विरुद्ध ग्रामीण अशा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दर वर्षी समाधानकारक पाऊस पडणाऱ्या कोकण विभागातही पाणीप्रश्न उभा राहण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.
आता पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू असतो. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून १५ ऑक्टोबरपर्यंतच्या पाणीसाठ्यावरून आगामी पावसाळ्यापर्यंतचे पाण्याचे नियोजन करण्यात येते. हा हंगाम संपण्यास जेमतेम तीन दिवस उरले असताना, जलसंपदा विभागाने राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार राज्यात १४० मोठी धरणे असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि दोन हजार ८६८ लघु प्रकल्प आहेत. या विविध धरणे आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठा हा सुमारे ६४ टक्के असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत हा पाणीसाठा सुमारे ७६ टक्के होता. त्यामुळे यंदा पाण्याबाबतीत चिंताजनक परिस्थिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment